Wednesday, December 4, 2013

असेच कुणीतरी असावे !!


काळोखाच्या गर्द जाळ्यातून
जसे प्रकाशाने यावे
दुर्गम अससेल्या वाटेतूनही
मग सोपे मार्ग दिसावे

अश्रुंच्या त्या धारानीही
तिथेच असे थांबावे
दुखः सर्व विसरून
ओठी हसू उमटावे

भरकटलेल्या त्या मनानेही
स्तब्ध उभे रहावे
आलेल्या त्या वर्षावात
चिंब असे भिजावे

वा-याच्या त्या झुळूकेवर
जसे फुलांनी डोलावे
पैंजणाच्या तिच्या तालावर
स्वर तसे घुमावे

डोळे थोडे तिरपे करून
आपण तिला पाहावे
असे काही क्षण
अनंतकाळ टिकावे

नाजुकश्या तिच्या स्पर्शाने
लाजळूनेही मग लाजावे
हृदयातल्या त्या भावनांनी
हळूच ओठावर यावे

कुठल्याश्या विनोदावर दोघांनी
अगदी मनसोक्त हसावे
हरवून भान सगळे
स्वतःलाच मग विसरावे

अश्या मधुर नात्यात
कधी दुरावे नसावे
आयुष्याच्या ह्या प्रवासात
असेच कुणीतरी असावे !!
------------------------------------------------

श्रीनिवास

Saturday, June 22, 2013

प्रेम हे नक्की काय असते ? ..



Love


कधी कधी मनात असलेल्या विचारांना वाट करून द्यायची असेल तर ते कागदावर उतरवावे. मन मोकळे होते. पण आजकाल, झाडे कमी होत चालली आहेत. म्हणून ते ऑनलाइन उतरवले तरी चालेल. कागद, निसर्ग पण सुरक्षित आणि आपण पण खुशीत.

आता मूळ मुद्द्यावर येवूया. खरे तर, काही मूळ मुद्दा नाहीये इथे. मुद्दामच काही तरी लिहायला घेतले आहे. बरेच दिवस झाले, मनातल्या भावना ऑनलाइन मोकळ्या केल्या नव्हत्या ;)
असो, आता काही लिहायचे म्हंटले तर विषय हा लागणारच. नाही तर कोण वाचणार आणि कशासाठी ?
उगाच काही तरी लिहूनही अर्थ नाही. मग ? .. ठीक आहे.. चला, काही तरी नेहमीचेच बोलूयात/ लिहुयात.
प्रेम ! प्रेम हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. काही लोकांच्या मते, प्रेम म्हणजेच जिव्हाळा.
आता “प्रेम” म्हणजे नेमके काय हो ? खरच .. मला तरी नक्की नाही माहिती ह्या so called “जादुई” शब्दाचा अर्थ.
“आयुष्य जर सार्थक करायचे असेल तर एक तर तुम्ही कुठल्याश्या देवस्थानाला तरी भेट द्यायला हवी किंवा कुणावर तरी प्रेम करायला हवे.” असे पुसटसे कुठे तरी वाचल्यासारखे आठवते ( कदाचित मीच लिहिले असेल कधी तरी.. कुठे तरी..पण असो :P )

आपल्याला कळायला लागल्यापासून कुणी न कुणी आपल्या परिचयाचे ह्या विचित्र आजाराने त्रस्त झालेले आपण पाहिले असेल (येथे आजार = प्रेम अशी उपमा देवून मी जरा कलात्मक असण्याचा/दिसण्याचा मिष्किलसा प्रयत्न केला आहे.)

थोड्या वेळापूर्वी “प्रेम हे नक्की काय असते हे स्वतच समजवून घेण्याचा मी प्रयत्न केला.
मग, मला हे प्रश्न पडलेत,  कुणाला तरी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवण्यासाठीची अनामिक उत्कटता म्हणजेच प्रेम का ? .. आपल्या एकलकोंडेपणाला लपवण्यासाठी कुणाला तरी मिळवण्याची निष्पाप धडपड म्हणजे प्रेम का? .. कुणाला अचानक बघून अंगावर आलेला शहारा म्हणजे प्रेम का ( हसू नये !) ?.. का समोरच्या सुंदर (सुंदरता हा मोठा अवघड शब्द आहे. तुम्हाला सुंदर वाटणारी गोष्ट दुसर्‍याला सुंदर वाटेलच असे नाही.. बर.. सोडा ते..) व्यक्तिला बघून नकळत आलेले मनातील निरागस विचार ? .. की कुणाला तरी झाले म्हणून मलाही होते आहे असे वाटणारी मनाची फसवी समजूत म्हणजे प्रेम ?

“पाणी” म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर पाणी म्हणजे काय याची एक पुसटशी आकृती तरी येते ( कुणाला समुद्र सुचतो, कुणाला नदी, कुणाला पाऊस तर कुणाला बिसलेरीची बाटली) पण, पाणी आपण बघू शकतो, अनुभवू शकतो.

भावनांचे तसे नसते. हे सगळे आपल्या मनाचेच खेळ. ( तसे
, मन असते हा पण एक अंनूतरित प्रश्न आहे.. पण आज नको). भावना ह्या फक्त अनुभवायच्याच असतात.
प्रेम ही सुद्धा एक अशीच भावना आहे हे तरी नक्की. आता तिची अनुभूति कधी, कुणाला आणि कशी होईल हे सांगणे अवघड आहे. पण प्रेम हे असते ह्याची जाणीव म्हणजे जीवंत असल्याची अनुभूति.

म्हणून, “प्रेम काय असते” ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित “एक अशी गोष्ट जी तुम्हाला तुम्ही सजीव असल्याची जाणीव करून देते, आणि समोरच्या सजीव व्यक्तिला देखील तुम्ही खरच सजीव आहात याची प्रचिती पटवून देते” असे असेल.

नाही माहीत.. आता अश्याच विचारांच्या जाळ्यात अजून गुरफटत बसून, तुमचा जास्त वेळ घेण्यातही मजा नाही.
उत्तर मी शोधत राहील..कदाचित सापडेल .. कदाचित नाही .. बघूया.. कळवत राहीन !

तुम्हाला सापडले तर जरूर कळवा...

मी थांबतो आता.. पुन्हा भेट होईलच.. “प्रेमाने” भेटा म्हजे झाले J

Monday, April 30, 2012

असेच.. काहीतरी..पावसाळ्यातच.. काहीतरी लिहिलेले !!





पावसाळा आला की माझे असे होते, मन भरून येते आणि काही तरी लिहावेसे वाटते .. खूप काही लिहावेसे वाटते....

पावसाच्या त्या धारांनी जमिनीवर कोसळताना केलेल्या नाजून आवाजाने .. त्यांनी भिजवून टाकलेल्या त्या मातीच्या सुंदर सुवासाने .. डबकयातल्या त्या बेडकांच्या नादाने ...भर रस्त्यात साचलेल्या पाण्यात .. निरागसपणे खेळणार्‍या आणि ओहळात सोडलेल्या त्या लहानग्या मुलांच्या कागदी होडीने.. मनाच्या कोपर्‍यात एक हलकेसे हास्य फुलते... आणि .............

आणि मग.. सुरू होतो .. प्रवास... विचारांचा........... असाच.. .. नकळत.. .. सुरूच राहतो... दर पावसाळ्यात...
मनातल्या गोष्टी.. मनातले ते विचार.. ते सर्व अगदी न ठरवता .. न सांगता .. न विचार करता .. येत जातात.. आणि बर्‍याच वेळा .. आपण विचार करायला कधी लागलो.. असे आठवत बसतो.. 

दिवसाच्या सुरवातीला काही तरी अश्या घडामोडी घडत असतात ज्यामुळे आपला दिवस .. काल ठरवल्या पेक्षा कसा तरी वेगळा जातो..तसाच आठवडा जातो.. जसेच महीने आणि वर्षेही सरतात.. आणि अगदी .. तसेच आयुष्यही  ..
 
विचार करायला लागल्या क्षणापासूनच आपसूकच काहीतरी जवाबदारी येते.. अगदी छोटी म्हणत म्हणत मोठी होत जाते.
छोट्याश्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटायला लागतात आणि मोठ्या गोष्टी अगदीच छोट्या .. हे अवघड आहे ...हे  सोपे आहे..हे चांगले आहे .. हे वाईट आहे ..असे आपणच आपल्याला समजावत असतो .. वेळ कसा निघून जातो अगदी लक्षातच येत नाही.
 
विजेच्या तारेवर बसलेल्या पक्ष्याकडे पहिले की असे वाटते, आपण असे हवे होतो. वाटले तर उडावे.. वाटले तर बसावे.. वाटले तिथे जावे.. राहावे.. आणि आकाशाच्या दिशेने भरारी मारत.. गीत गात .. धुंद व्हावे.
 
पावसात भिजत जाणार्‍या दुचाकीच्या मागे बसलेल्या त्या प्रियसी कडे पाहून कधी तिच्या प्रियकराचा सुद्धा कधी कधी हेवा वाटतो.. तर कधी कधी.. त्याच पावसात .. मर्सडिजच्या सीटवर बसून एकटेच जाणार्‍या त्या माणसाचाही... तर कधी.. त्याच पावसात .. आपल्यातच  मग्न असलेल्या त्या लहान मुलांचा हेवा वाटतो......आणि मग अगदी अशाच वेळी..फक्त आपल्याच हातात असणार्‍या  छत्रीकडे पाहून सभोवतालच्या आठ-दहा डोळ्यातला  हेवाही आपलायला दिसतो..
 
मग.. परत विचारचक्र सुरू होते.. आनंद म्हणजे नेमके काय हो ??.. कधी होतो ??.. (आता तो कुणाला होतो आणि कश्या वेळेस होतो यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात म्हणा )
 
पण.. मग, मी काही वेगळा आहे का ?.छोट्या छोट्या गोष्टी मला कधी कधी खूप आवडतात तर कधी कधी खूप दुखावतात ..भारतातल्या भ्रष्टाचारापासून ते शेजारच्या गोठ्यातल्या बकरीविषयी  माझी काही तरी मते आहेत.. प्रत्येकाची असतात..मनातल्या अश्या गोष्टी बरेच दिवस मनात राहतात आणि कधी तरी पुन्हा जाग्या होतात..कधी आनंद देतात तर कधी अंतर्मुख करतात.
 
बालपणपून केलेल्या त्या खोड्या आणि खाललेला तो मार आठवतो.. शाळेसमोर त्या पहिल्या दिलेल्या सुविचाराच्या वेळेस लटलाटणारे पाय  आठवतात... शाळा बुडवून रात्री पाहिलेले ते सर्व चित्रपट आठवतात .. प्रेम म्हणजे नेमके काय हे कळत नसतानाही .. .बालपणीच्या निष्पाप आणि निरागस पहिल्या प्रेमाच्या त्या भावना आठवतात.. कॉलेज मध्ये चुकवलेले ते सर्व लेक्चर्स आठवतात...बाहेरच्या हॉटेलमध्ये बसून चहाच्या घेतलेल्या त्या झुरकया आठवतात.. इंटरव्ह्युसाठीच्या एस्त्री केलेल्या त्या शुभ्र शर्टावर उडलेले ते शिंतोडे आठवतात.. ऑफिसला खोटे कारण सांगून पावसात सर केलेले ते गड आठवतात.. मित्रांसाठी आणि त्यांच्या लग्नासाठी केलेले ते प्रवास आठवतात... दूर शहरातून घरी पोहोचण्यासाठीचे ते शर्थीचे प्रयत्न आठवतात.. जुन्या गोष्टी आठवून भर पावसात गाळलेले ते अश्रु ही आठवतात.. हळुवार सुरू होवून आक्राळ विक्राळ होणार्‍या अश्या त्या पावसातल्या सार्‍या आठवणी आजही अगदी कालसारख्या स्वच्छ आठवतात..
 
श्रावणधारांच्या ह्या मोसमात काय जादू असेल ती असेल... मन माझे हे वेड्यागत विचारांच्या चक्राला अजून गती देत सुटते.. आणि आजवर अनुभवलेल्या त्या प्रत्येक पावसाच्या आठवणींचे गाठोडे अगदी अलगद उलगडत जाते .. मग.. अश्याच आठवणींच्या पसार्‍यात मी हरवत जातो.. अगदी नेहमी... दर पावसाळ्यात ...

खरच .. पावसाळा आला की माझे असे होते, मन अगदी भरून येते आणि काही तरी लिहावेसे वाटते .. खरच .. खूप काही लिहावेसे वाटते..


मी आणि माझी मराठी



----------------------------------------------
महत्वाची नोंद :
सादर केलेले विचार हे माझे व्ययक्तिक असून त्यांच्याशी प्रत्येक व्यक्ति सहमत असेलच असे नाही.  हे सर्व लिहिण्यामागे प्रांतवादाचा किंवा भाषिक वैर तयार करणे हा हेतु नसून, आपल्या महाराष्ट्रात आपल्याच माय मराठीच्या मी पाहिलेल्या व अनुभवलेल्या सद्यस्थिती वरचे विचार मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. यातून चुकून-माकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीर आहे.
-----------------------------------------------

मागच्याच वर्षी.. चेन्नईला नवीन जॉब (नोकरी ) मिळाली. आता जाणे भागच होते.  कामानिमित्त काही गोष्टींचा त्याग करावाच लागणार होता. मुंबई नावच्या कॉस्मोपोलिटन (मराठीत काय म्हणता नाही माहीत ) शहरात राहिल्यानंतर आता चेन्नई नावच्या नवख्या भागात जावे लागणार होते. सुदैवाने एक मित्र होता तिथे,त्यामुळे थोडे बरे होते. त्याला विचारले.. "बाबारे.. काय म्हणते चेन्नई... कसे आहे ?.. मुख्य अडचण कसली येईल ?.."
"जेवण आणि भाषा.." त्याचे हे उत्तर फारच लहान वाटले... म्हंटले.. ठीक आहे.. भागून जाईल.

मग काय...केली मनाची तयारी आणि आलो चेन्नईला.
मात्र राहायला गेल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली.
आल्यानंतर जेवणाची फारशी अडचण नाही झाली. लहानपणापासून बाहेरगावी राहण्याची सवय असल्याने जेवण हा मुख्य मुद्दा नव्हता. मुख्य अडचण होती ती भाषा..
(कृपया लक्षात घ्या मला अडचण म्हणायचे आहे. त्रास नाही ... अडचण ही आपल्यात असलेल्या उनिवेमुळे स्वतःलाच तयार होणारा त्रास हा असा माझा येथे संदर्भ आहे. )

पोहोचलो आणि लगेचच झाली पंचाईत.. अगदी उतरल्याक्षणापासून .. मित्राच्या घरी कसे जायचे ?” उतरल्यावर हा तर सर्वात आधी तयार झालेला मोठा प्रश्न होता.त्याला संपर्क केला. परंतु, भ्रमणध्वनी असल्यामुळे तशी चांगली सोय झाली, मित्रास संपर्क केला आणि रिक्षावाल्याच्या हातात भ्रमणध्वनी सोपवला. रिक्षावाला आणि मित्र दोघेही एकमेकाला तामिळ भाषेत काहीतरी समजून देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करू लागले.. मी ही समजावून घेण्याची सुरवात केली आणि लगेचच लक्षात आले, हे कुरन आपले नव्हे.
कसातरी पोहोचलो आणि त्या दिवसापासून..आजतागायत अनेक अनुभव आलेत. अनेक वेळा पेच तयार झालेत. मात्र तिकडे मित्रपरिवार अत्यंत मदत करणारा आणि समजावून घेणारा मिळाला. सर्वच गोष्टीत मदत झाली. सांगायचे तात्पर्य .. यात जर दोष कुणाचा असेल तर माझाच.. कारण मला ती भाषा येत नाही.  चेन्नईला येवून जर आपण इंग्रजी किंवा हिन्दी मध्ये बोलालत तर आपणास जे विचारले त्याचेच उत्तर मिळेल. मात्र आपण तामिळ मध्ये बोलून किंवा बोलण्याचा प्रयत्नतरी करून पहा, समोरचा तुम्हाला आपुलकीने दहा चांगल्या गोष्टी सांगेल.
हे सर्वच ठिकाणी आहे.(महाराष्ट्रात तुलनेने खूपच कमी ) त्याचमुळे माझेही तामिळ भाषा शिकण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि मित्रांच्या कृपेने त्यात जुजबी यशही आहे.  ते असो..

आता मला जवळपास आता एक वर्ष झाले आणि ह्या दरम्यान दुसर्‍यांदा घरी आलो.. पहिली चक्कर ही खूपच छोटी होती आणि म्हणून जास्त वेळही नाही मिळाला असा विचार करायला. ह्या खेपेस मात्र जवळपास दोन आठवडे घरी होतो.. थोडाफार प्रवासही झाला.. निरनिराळी लोकेही भेटली..बोललीत आणि विचारांचा एकाच चिवडा तयार झाला... आता त्याच विचारांच्या चिवड्याचे पुडके सोडतोय ...

चेंनाईहून परत आल्यावर आतापर्यंत भेटणार्‍या बर्‍याच लोकांनी मलाच सहानभूती दिली.. बरीच लोके म्हणलीत खरच हो.. खूप अवघड आहे तिथली लोके..हिन्दी आणि ईग्रजी बोलायला टाळाटाळ करतात .. त्यांचीच भाषा रेटतात
मलाही सुरवातीला ते तसेच वाटायचे... पण अलीकडे काही वेळा... सहजिकपणे आपल्या महराष्ट्रात आल्यावर मराठी बोलत असताना मला इंग्रजी घ्यायला लागणारा आधारही बराच वाढायला लागला (काही लोकांना ते खूप चांगले वाटते...आणि काही तर ते मुद्दामही करतात ..तर काहींना असे केल्यावर उगाच आव आणून भाव खातो आहे असेही वाटते.) पण मग तेव्हा, थोडावेळ मिळाला की मीच स्वतःला विचारायला लागलो. अस्सल मराठी म्हणवून घेण्याची आपली पात्रता आहे का ? मराठीचा नक्की आपल्याला गर्व असायला हवा की मराठी असून मराठी येत नसल्याची लाज ?? की हा सगळं एक टोकाचा प्रांतवाद आहे ??” अश्याच विषयातून तयार झालेल्या माझ्या ह्या भावना मी जमेल तितक्या थोडक्या स्वरुपात मांडण्याचा प्रयास केला आहे.

मुंबईला राहून एक गोष्ट मी खूप अनुभवली. ती म्हणजे मराठी लोके न ओळखता येणे (निदान मलातरी ). महाराष्ट्राच्या ह्या राजधानीला संपूर्ण देश, आर्थिक राजधानी म्हणवतो. सर्व धर्म आणि प्रांतांचे लोके तिथे आलेत आणि कालांतराने मराठी ही लुप्तच होत गेली. हिन्दी भाषिक लोके आलीत आणि मराठी माणूस कौतुकाने आपण किती लवकर हिन्दी शिकू शकतो ह्या स्पर्धेतच हरवला. स्वतची भाषाच विसरला. तिथे स्थायिक होणार्‍या प्रत्येक परप्रांतीयांकडून त्यांची भाषा शिकला आणि मराठीचे अस्तित्व गमावून बसला. मुंबईत राहणार्‍या माझ्या अनेक परप्रांतीय मित्रांना त्यांच्या मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान असल्याचे आणि स्वकीय मराठी लोकांना फ्याड ईंग्रजीचे असलेले खूळही मी पहिले आहे. मराठी घरातल्या व्यक्तीने समाजाने आपलेसे करावे म्हणून मराठीचा त्याग करून दुसर्‍या भाषांचे गायलेले गोडवेही पाहाला मिळतात. माझे हे सांगण्याचा फक्त मराठीच शिका आणि इंग्रजी / हिन्दीचा त्याग करा असा याचा अर्थ बिलकुल नव्हे. तसे ध्वनित होत असेल तर माझ्या शब्दांच्या मांडणीला माफ करा.

याबद्दल कुठेही दुमत नाही की इंग्रजी आणि हिन्दी ह्या अत्यंत महत्वाच्या भाषा आहेत. कारण... कारण ..आज त्या बर्‍याच ठिकाणच्या स्थानिक भाषा बनल्या आहेत. जेथे आपण गेलो तर आपल्याशी कुणी मराठीत बोलणार नाहीत. साहजिकच आहे, अश्या गोष्टी कुणावर लादायच्या नसतात, त्यांची सवय,ओळख आणि जडणघडण लहानपणापासून होणार्‍या संस्कारातूनच होत असते. आपणही दुसर्‍या भाषा शिकले पाहिजे, व्यक्तिमत्वाचा आणि प्रतिभेचा विकास होण्यास हे खूप मदतशीर ठरते. पण हे सर्व करत असताना आपण आपल्या मराठीभाषेचा उपहास का करायचा ? मराठी वाङ्मय इतके समृध्द असताना आपण त्याची उपेक्षा का म्हणून करायची ?.
आजकालच्या लहान मुलांना Twinkle twinkle little star गीत म्हणता आल्यावर आपण कौतुकाने त्यांच्याकडे पाहतो मग त्याचवेळी चंदा मामा चंदा मामा ये रे ये असे गाणार्‍या बच्चेकंपनीकडे दुर्लक्ष का ?

स्वातंत्र्यकाळानंतर ईंग्रजांनी चेन्नई आणि मुंबई एकाच वेळेस सोडले असेल. पण, आज मुंबईला आणि चेन्नईला येणारा जो कुणी ईंग्रज येतो, त्यालाही  मुंबई ही जणू त्यांच्याच गावाकडची वाटु लागते. मराठी माणूस मग अश्यावेळी सुखावतो. "आपण बरीच प्रगती केली" असे काहीतरी स्वतचे गैरसमज करून नमस्कारा एवजी आपले हात शेकहँड साठी पुढे होतात. "Hi.. Hello.. How do you do ?" असे आपण म्हणायला लागतो. चेन्नईला मात्र तसे झालेले दिसत नाही.. स्थानिक लोकांनी त्यांच्या भाषेचा अत्यंत आदर केला आणि येणार्‍या प्रत्येक परप्रांतीयसाही करायला लावला. अन्यथा त्यास जास्त आपलेसे केले नाही. पण भाषा शिका आणि मगच येथे रहा अशी माजोरीही केली नाही. लोक सर्वच चांगली आणि समजूतदार असतात. परिस्थिती लोकांचे स्वभाव बदलवण्यात मोठी भूमिका बजावते. तिथल्या परप्रांतीयांनीही परिस्थिती ओळखून तिकडची भाषा आत्मसात केली आणि आज गुण्यागोविंदाने तिकडे ती लोके नांदत आहेत. आता रजनीकांतचेच उदाहरण घ्या ना. मुळाचा मराठी असललेला तिथे जाऊन इतके सुंदर मिसळला की आता लोके त्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दुग्धभिषेक करतात. आपल्याला महाराष्ट्रात मात्र हे जमलेच नाही. येणार्‍या प्रत्येकासाठी आपणच आपली भाषा सोडली असे वाटायला लागते.

"प्रत्येक देशाच्या प्रगतीसाठी त्यादेशात एक भाषा ही राष्ट्रभाषा असते. सर्व देशवासिय ती भाषा बोलतात आणि देशांतर्गत होणार्‍या सर्व आर्थिक,व्यावसायिक आणि प्रसंगी दैनंदीन व्यवहारात तिचा उपयोग होतो आणि अश्यातूनच देशाची प्रगती होते." हे असे किंवा अश्याच आशयाचे काहीतरी आम्ही इतिहासात शिकलो.
आपल्या हिंदुस्थांनाची देशभाषा ही "हिन्दी" झाली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने जणू हिंदवी स्वराज्याच्या सोबतच हिन्दी राज्याच्या स्थापनेची शपथ घेतली असे वाटायला लागले.

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" आणि "अमृताशी देखील पैंजा जिंकणारी ती मराठी" असे आपणच म्हणायचो का असा प्रश्न आता मला पडायला लागला. मुंबईमध्ये असलेल्या मराठी माणसाला समोर इंग्रजी बोलणार्‍या मुलामुलींना पाहून लाजायला का होते ? चेन्नईमध्ये असे लाजणारा मनुष्य मी तरी नाही बघितला. इंग्रजी किंवा हिन्दी बोलायला माझा विरोध बिलकुल नाही. पण मराठी बोलायला का लाज ??.. कित्येत ठिकाणी मराठीमध्ये बोलायला दोन मराठी माणसे आता चारवेळा विचार करायला लागल्यासारखे आहेत असे जाणवते. महाराष्ट्रात मराठी नाही तर काय बोलणार तुम्ही ? आता कृपया ह्यास हा प्रांतवाद आहे असे म्हणू नका. ज्या परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोर्यगाथा एकताना आमच्या लहानपनीही अंगावर काटे यायचेत , आता राजांच्या त्याच महाराष्ट्रात मराठीची ही केविलवाणी अवस्था पाहिल्यावर मोठेपणीही अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत.

उदाहरणादाखल सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये बरीच सॉफ्टवेअर ही आता आपल्या स्थानिक भाषेत रूपांतरित  होत आहेत. कुठलेही असे नवीन सॉफ्टवेअर उचला आणि पहा..तुम्हाला "तामिळ" भाषा ही दिसलीच पाहिजे. एकवेळ हिंदीहि नसेल पण तामिळ असेल. अर्थात 'तामिळ' भाषा तिथे असणे हे गैर नाही .. बिलकुल नाही.. उलट गर्वाचीच गोष्ट आहे. पण मग 'मराठी' तिथे का नसावी ? आता मराठी लोके सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये कमी आहेत असा नका सांगू.. पुराव्यानिशी सादर करता येणार नाही हा दावा J

आधी तरी म्हणता यायचे पुण्यात जा आणि पहा .. मराठी थोडीफार लाज सांभाळून होती ती त्या पुण्यात. पण आता विद्येचे माहेरघर म्हणता म्हणता सर्व कॉलेजेस आलीत आणि साहजिकच परप्रांतीयही तेथे गोळा होवू लागलेत. मग आपल्याकडची माणसे म्हयालया मोकळी झालीत की ह्याच मुळे मराठी कमी झाली ..अरेपण आता हीच गत चेन्नईची का नाही झाली ? तिथेही आहेतच की सर्व चांगली कॉलेज आणि विद्यापीठे ?

फरक सोपा आहे. तिथली स्थानिक लोके त्यांच्या संस्कारांना जपून आहेत आणि येणार्‍या पिढ्या दर पिढ्या ते पाळत आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमाततर हिन्दी हा विषय देखील नाही.( ह्याला माझे समर्थन बिलकुल नाही ). त्यांच्या प्रदेशात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला त्यांच्याशी संवाद साधायला जरी अडचण होत असेल तरी चालेल पण "आपण आपली भाषा टाकून त्या व्यक्तीच्या भाषेत तोडके मोडके संवाद साधायचे नाहीत" हे सोपे ब्रीद ती लोके पाळतात. त्यात गैर काहीच नाही. कारण अश्यावेळी समोरच्यालाही कळत नाही की तुम्हाला काय म्हणायचे आहे. ( इथे समजून घ्या की असला हा प्रकार "गरज समोरच्याला आहे म्हणून आपण शिष्ट व्हावे" अश्यातला नाही.)  हा सवयीचा भाग आहे. तुम्ही ज्या भारतात राहतात त्यात जरी हिन्दी राष्ट्रभाषा असली तरी जन्मल्यापासून आपण जिथे लहानाचे मोठे झालो त्याच मातीतली भाषा तुम्हाला येणे स्वाभाविक आहे. म्हणूनच, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हिंदीच बोलावे असा भारतात नियम नाही.  अश्यावेळी तुमच्या स्थानिक संस्कृतीचे आणि भाषेचे तुम्ही जतन का करू नये ? आता, जर तुम्हाला अमेरिकेला जायचे असेल तर तुम्ही झक मारून इंग्रजी शिकणार पण मग तामिळनाडू मध्ये येताना तामिळ शिकायला काय अडचण आहे ? असा साहजिक प्रश्न येथे तयार होतो. जर आपण लहानअसल्यापासून मराठी बोलत आलो आहोत तर मोठेपणी कुणा दुसर्‍याला सुखावण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनाच्या भाषेचा त्याग का करावा ? इंग्रजी आणि हिन्दी शिकाच आणि त्याच बरोबर मराठीलाही मनाचे स्थान द्या. "माझी मुले मराठी शाळेत शिकतात" असे कुणी म्हंटले तर त्याकडे केविलवाण्या दृष्टीने आज आपलाच मराठी समाज का पाहतो ??  मराठीचा स्वाभिमान आपण एतक्या लवकर का टाकून देतो ? मुलाला इंग्रजी किती सुंदर बोलता येते हे सांगणारी पालक मंडळी मी लहानपणापासून पाहत आलोय. पण मराठीत प्रथम आला म्हणून कौतुक करणारी आई-वडील काही मला दिसली नाहीत. असे का ?

आता हे सर्व मीच प्रथम म्हणतो आहे असे नाही. आचार्य बर्वे यापासून ते राज ठाकरे सुध्हा तेच सांगत आहेत. आता ह्या माझ्या बोलण्यामागे काही राजकीय हेतु नाही आणि कुणा पक्षाची तरफदारीही करण्याचा इरादा नाही. हा केवळ एक प्रयत्न आहे तो माझे विचार मांडण्याचा. आपण एकलेल्या आणि सांगितलेल्या गोष्टी विसरतो.  आपणच काय..अगदी सर्वच लोके विसरतात. म्हणूनचतर ... पुन्हा पुन्हा त्याच कथा घेवून नवीन नवीन सिनेमे तयार होतात आणि यशस्वी ही होतात J

आज पन्नास वर्षांनंतरही "जय महाराष्ट्र असे मराठीत म्हणताना माझ्या मुलाबाळांच्या माना गर्वाने उंच राहव्यात हाच प्रामाणिक हेतु आहे .आपण येणार्‍या पिढीला मराठीभाषेचे आणि आपल्या संस्कृतीचे महत्व पटवून देवूयात. मराठीच्या होणार्‍या ह्याअवहेलनेला थांबवूयात. पुन्हा आज "मराठा तितुका मेळवावा .. महाराष्ट्र धर्म वाढवावा" ह्या शब्दांचे महत्व जाणून घेवून कृतीस सज्ज होवूयात.

ह्या नवीन वर्षानिमित्तही (ख्रिस्ती नववर्षानिमित्त) नेहमीप्रमाणे आपणही काहीबाही संकल्प सोडणार आणि ते ही अर्ध्यात सोडणार... आता ह्यावेळी जरा निराळा संकल्प सोडूयात... "मराठी न सोडण्याचा"... आणि हा संकल्प अवघे आयुष्य निभावूयात ....काय म्हणता ??

बर्‍याच दिवसांनंतर मला आज न राहवून मी हे लिहायायला घेतले आहे. माझ्या ह्या लिहिण्यामुळे एका जरी मराठी बांधवाने ह्या विचारामुळे मराठीचा सन्मान करायचा ठरवलं तरी हे माझे प्रयत्न सार्थी लागलेत असे वाटेल.

जय महाराष्ट्र .. जय मराठी !!

आपलाच : श्रीनिवास पाटील

( टीप: शक्यतितक्या ठिकाणी मराठी शब्द मांडण्याचा हा प्रयत्न होता. काही राहिले असल्यास व चुकले असल्यास आपलाच समजून माफी असावी. )